केबीसीचा प्रवास आठवताना अमिताभजी झाले भावूकR...
केबीसीचा प्रवास आठवताना अमिताभजी झाले भावूक…म्हणाले, चित्रपट मिळत नव्हते म्हणून करावे लागले होते (KBC 13: Amitabh Bachchan gets emotional, Says He Was Forced to Host KBC: ‘Film Mein Kaam Mil Nahi Raha Tha’)

अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजेच ‘केबीसी’ला २१ वर्षे पूर्ण झाली. एक अनोखी संकल्पना आणि बिग बींचे उत्तम होस्टींग यामुळे गेल्या २१ वर्षांत या शो ची लोकप्रियता तसुभरही कमी न होता उलट दिवसेंदिवस हा गेम शो धमाल करत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे १००० भाग पूर्ण झाले असून हा आनंद साजरा करण्यासाठी शोच्या सेटवर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नव्या नंदा या उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी अमिताभजींनी शोशी संबंधित त्यांचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्यातील वाईट टप्पा आठवला अन् त्याबद्दल बोलताना ते अतिशय भावूक झाले.

केबीसी १३ च्या हजाराव्या एपिसोडच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने, बिग बींना त्यांची मुलगी श्वेता बच्चन यांनी विचारले, “पापा, हा तुमचा १००० वा भाग आहे, तुम्हाला कसे वाटते?” मुलीच्या बोलण्याला उत्तर देताना अमिताभ बच्चन हळवे झाले आणि त्यांनी सांगितले की, केबीसीमधील त्यांचा प्रवास तेव्हापासून सुरू झाला जेव्हा त्यांना चित्रपटात काम मिळत नव्हते.

याला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले, ‘खरं तर २१ वर्षे झाली आहेत. २००० साली या शोची सुरुवात झाली आणि त्यावेळी मला काही कल्पना नव्हती. प्रत्येकजण म्हणत होता की तू चित्रपटातून टेलिव्हिजनकडे जात आहेस. मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्यावर येत आहे. यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल, पण आमची परिस्थिती अशी होती की, त्यावेळी मला चित्रपटात काम मिळत नव्हते. त्यामुळे मला टीव्हीकडे वळावे लागले. पण पहिल्या प्रक्षेपणानंतरच ज्या प्रतिक्रिया येऊ लागल्या, त्यानंतर सारे जगच बदलले असे वाटू लागले.’

अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, ‘मला सगळ्यात चांगली गोष्ट आवडली ती म्हणजे आमच्या आलेल्या प्रत्येक स्पर्धकाकडून मला दररोज काहीतरी शिकायला मिळाले.’

यानंतर शोमध्ये 2000 सालापासून ते आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला, तो पाहून अमिताभ बच्चन भावूक झाले आणि अश्रू पुसताना दिसले. अमिताभजींसाठी हा क्षण भावूक होता. या शोमध्ये जया बच्चनही दिसत आहेत. त्याही खूप शांत आणि भावूक दिसत आहेत. अमिताभ शेवटी म्हणाले, ‘मी भावूक झालो’.
या व्यतिरिक्त या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी श्वेता, नव्या आणि जया बच्चन यांच्यासोबत काही मजेशीर क्षण घालवले आणि धमाल करतानाही दिसले.