‘भाभीजी घर पर है’ फेम शुभांगी अत्रेचा संसार मोड...
‘भाभीजी घर पर है’ फेम शुभांगी अत्रेचा संसार मोडला; लग्नाच्या १९ वर्षांनंतर घेतला घटस्फोट! (Bhabiji Ghar Par Hai Fame Shubhangi Atre Separates From Husband After 19 Years, Says- Some Damages Are Beyond Repair…’)

‘अंगुरी भाभी’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने नुकतीच तिचा घटस्फोट झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
‘भाभी जी घर पर है’ या मालिकेने प्रेक्षकांची पंसती मिळवली आहे. या मालिकेतील सगळीच पात्रं प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. याच मालिकेत ‘अंगुरी भाभी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या आयुष्यात मात्र सध्या मोठं वादळ आलं आहे. ‘अंगुरी भाभी’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने नुकतेच तिचा घटस्फोट झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. १९ वर्षांच्या संसारानंतर शुभांगी अत्रे हिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभांगी आणि तिचा पती दोघेही गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत होते. लग्नाच्या १९ वर्षानंतर ती पती पियुष पुरेपासून विभक्त झाली आहे. परस्पर विसंवादामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. शुभांगी आणि पियुषचे लग्न २००३ मध्ये इंदूरमध्ये झाले होते. त्यांना एक मुलगी आहे.

अभिनेत्री शुभांगी अत्रेचा पती पियुष पुरे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. यापूर्वी अभिनेत्री अनेकदा पतीचे कौतुक करताना दिसली होती. पतीने नेहमीच आपल्याला पाठिंबा दिला आणि आपली कारकीर्द घडवण्यात मदत केली, असे शुभांगी म्हणाली होती. मात्र, आता दोघांच्या नात्यात दुरावा आला असून, दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. याविषयी बोलताना शुभांगी अत्रे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने तिचे लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण तरीही त्यांच्यातील मतभेद दूर होऊ शकले नाहीत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगी म्हणाली की, ‘जवळपास एक वर्ष झाले, आम्ही एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. या नात्यासाठी परस्पर आदर, विश्वास, सहवास आणि मैत्री आवश्यक आहे. काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळे, आम्ही एकमेकांना स्पेस देण्याचे ठरवले आणि आमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे.’